Republic Day 2026 - बाह्य शत्रूंच्या शोधात अंतर्गत संकटांकडे दुर्लक्ष
विचारधारेच्या उजवीकडे असणाऱ्यांना स्वतःसमोरील अडचणींसाठी नेहमीच कोणी तरी ‘दुसरा’ हवा असतो. आपल्या मर्यादा स्वीकारण्याऐवजी त्या मर्यादांचे खापर फोडण्यासाठी बाह्य शत्रू शोधण्याची ही मानसिकता असते. दुसरीकडे, डावीकडील विचारसरणीत अनेकदा आपल्या बुद्धिसामर्थ्याचा गर्व दिसतो. तथापि, चिकित्सक आत्मपरीक्षणाअभावी उजव्या विचारसरणीतील लोक आपल्या धोरणात्मक अपयशांवर पडदा टाकण्यासाठी सतत अन्यांवर दोषारोप करतात. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे याचे ठळक उदाहरण. अमेरिकेसमोरील संकटांसाठी ते कधी चीन, कधी मेक्सिको, तर कधी स्वदेशातील ‘वोक’ म्हणजेच डाव्या विचारसरणीला जबाबदार धरतात.
आपल्याकडेही देशासमोरील आव्हानांसाठी कधी पं. जवाहरलाल नेहरू, कधी पाकिस्तान, कधी काँग्रेस, तर कधी ‘अर्बन नक्षल’ जबाबदार धरले जातात. आपल्या धोरणांतही त्रुटी असू शकतात, हे अशा सत्ताधीशांच्या गावी नसते. आणि अशांच्या मागे धावणाऱ्यांची नैतिकताही फारशी प्रामाणिक नसते. त्यामुळे या विचारधारेतील लोकांना सतत ‘बाह्य शत्रू’ लागतो. तो मुबलक मिळत राहतो. परिणामी, बाह्य घटकांवर दोष देत राहिल्यामुळे अंतर्गत सुधारणांची गरज कायम अपूर्णच राहते.
प्रजासत्ताक दिन हा अशा आत्मचिंतनासाठी योग्य मुहूर्त आहे. कारण भारत स्वतंत्र होत असतानाच धर्म, जात, पंथ, वर्ण वा लिंग यावर कोणताही भेद न करता सर्व नागरिकांना समान मताधिकार देणाऱ्या प्रजासत्ताकाची रचना करण्यात आली. अन्य अनेक देशांत स्त्रिया, कृष्णवर्णीय नागरिक यांना समान मताधिकारासाठी दीर्घ संघर्ष करावा लागला. भारतात तसे झाले नाही. ही पुण्याई पं. नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारकर्तृत्वाची आहे. त्यामुळे २६ जानेवारी हा केवळ उत्सवाचा नव्हे, तर आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आजच्या परिस्थितीत या ‘आंतरिक आव्हानांची’ दखल घेणे अधिक आवश्यक आहे.
अशीच काही महत्त्वाची ‘आंतरिक’ आव्हाने अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी अधोरेखित केली आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या त्या माजी मुख्य अर्थतज्ज्ञ. भारतीय वंशाच्या व्यक्तीने परदेशी संस्थेत उच्चपद मिळवले की आपल्याकडे अतिउत्साही अभिमान व्यक्त केला जातो. मात्र गोपीनाथ यांचे वैशिष्ट्य असे की त्या सत्य स्पष्टपणे मांडतात. परिणामी, इतर सत्यकथन करणाऱ्यांप्रमाणे त्यांनाही ‘भारतविरोधी’ ठरवले जाते. सध्या तसेच घडते आहे.
दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत गोपीनाथ यांनी भारतातील पर्यावरणीय दुर्लक्षावर अत्यंत स्पष्ट आणि म्हणूनच कटू भाष्य केले. अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या व्यापार निर्बंधांपेक्षा भारतीय शहरांतील अत्यंत निकृष्ट दर्जाची हवा हे मोठे संकट असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे आयात शुल्क किंवा व्यापारयुद्धे हे मुद्दे महत्त्वाचे असले, तरी खरा धोका आपल्या देशातील ढासळत्या पर्यावरणाचा आहे, असे त्यांचे प्रतिपादन. “पर्यावरण रक्षण हा केवळ पर्यावरणवाद्यांचा प्रश्न नाही; ढासळते पर्यावरण हे मूलतः आर्थिक आव्हान आहे,” असे त्या ठामपणे सांगतात.
हे अधोरेखित करताना गोपीनाथ आकडेवारी मांडतात. खराब हवेमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडते, रोजगारातून सुटी घ्यावी लागते, उत्पादक श्रम वाया जातात आणि वैद्यकीय खर्च वाढतो. याचा थेट परिणाम देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर होतो. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, खराब हवेमुळे जगभरात दरवर्षी औषधोपचारांवर सुमारे ५.७ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ५२ लाख कोटी रुपये) इतका खर्च होतो. ही रक्कम जागतिक उत्पन्नाच्या ४.८ टक्के आहे.
महत्वाच्या दिवसांसंबंधी असलेल्या पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
2.राष्ट्रीय अंतराळ दिवस २०२५ | National Space Day 2025 3.जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस २०२५ | World Senior Citizens Day 2025
भारतामध्ये दरवर्षी सुमारे १७ लाख लोकांचा मृत्यू केवळ पर्यावरणीय कारणांमुळे होतो. हे देशातील एकूण मृत्यूंच्या सुमारे १८ टक्के आहे. फक्त हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे १५ हजार कोटी डॉलर्सचा फटका बसतो. यामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा सुमारे १.७ टक्के हिस्सा नष्ट होतो. आधीच मर्यादित क्षमतेच्या अर्थव्यवस्थेसाठी हा भार अत्यंत गंभीर आहे.
म्हणूनच गोपीनाथ यांनी मांडलेली निरीक्षणे अत्यंत रास्त आणि विचारप्रवृत्त करणारी आहेत. हे प्रदूषणाचे संकट ना ट्रम्प यांनी निर्माण केले आहे, ना पं. नेहरू, मुसलमान किंवा ‘अर्बन नक्षल’ यांना त्यासाठी जबाबदार धरता येईल. हे पूर्णपणे सरकारच्या धोरणांशी संबंधित आणि सरकारद्वारे नियंत्रित करता येण्याजोगे संकट आहे. मात्र पर्यावरणविषयक प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सर्रास ‘विकासविरोधी’ ठरवले जाते, त्यामुळे समस्या अधिक गहिरी होते. वस्तुतः पर्यावरण आणि विकास हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत.
विकसित देशांकडे नजर टाकल्यास हे स्पष्ट होते. त्यांनी तिसऱ्या जगातील पर्यावरणीय अज्ञानाचा फायदा घेतला, हे जरी सत्य असले तरी त्यांनी आपल्या देशांतील पर्यावरण जपले. त्यामुळे जर भारताला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत स्थान मिळवायचे असेल, तर पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देणे अपरिहार्य आहे. दिल्लीतील हवेचा दर्जा आणि लंडनसारख्या शहरांतील हवेचा दर्जा यांची तुलना होऊच शकत नाही, इतकी आपण मागे आहोत. आरोग्यासाठी हवा निर्देशांक ५० च्या खाली हवा, तर दिल्लीमध्ये तो अनेकदा ४०० च्या पुढे जातो.
गोपीनाथ यांच्या विधानांचे गांभीर्य समजून घेण्याऐवजी त्यांना ‘भारतविरोधी’ ठरवणे हे आत्मघातकी आहे. त्यामुळे होणारे नुकसान भारतीयांचे आहे; गोपीनाथ यांचे नव्हे. त्या भारतात राहातही नाहीत. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीला दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या भवितव्याकडे डोळेझाक करण्यासारखे आहे.
याच इतके गंभीर दुसरे ‘आंतरिक’ आव्हान म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेची सातत्याने ढासळणारी गुणवत्ता. हवा अधिक निकृष्ट की शिक्षण, असा प्रश्न पडावा, ही स्थिती चिंताजनक आहे. ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ यांसारख्या नेहरूकालीन संस्थांचा अपवाद वगळता आपले शिक्षण बहुतांश वेळा गुणवत्तेऐवजी केवळ प्रमाणावर भर देणारे ठरते. सेवा क्षेत्रासाठी कारकुनी मनुष्यबळ तयार करण्यात ही व्यवस्था कुशल आहे; परंतु संशोधन, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेकडे दुर्लक्ष होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरणारे बहुतांश भारतीय हे आयआयटी-आयआयएममधून किंवा दक्षिणी राज्यांतून आलेले दिसतात. गूगल, मायक्रोसॉफ्ट, अडोब, आयबीएम यांसारख्या कंपन्यांतील अनेक उच्चपदस्थ दक्षिण भारतातून आले आहेत. त्यांनी उत्तम शिक्षण व्यवस्थेसोबत सांस्कृतिक परंपराही जपल्या. परिणामी, दक्षिणी राज्ये विकासगतीत चीन किंवा दक्षिण कोरियाशी स्पर्धा करतात, तर उत्तर भारत अजूनही आत्ममुग्धतेत अडकलेला दिसतो.
या असमतोलासाठी ना ट्रम्प जबाबदार आहेत, ना पुरोगामी विचारसरणी. प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात या खऱ्या आंतरिक आव्हानांकडे दुर्लक्ष होता कामा नये. अन्यथा आपण प्रजासत्ताक साजरे करत राहू; पण त्याचा आत्मा मात्र हळूहळू गुदमरून जाईल.
मागील महिन्यातील चालू घडामोडीवरील पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा